"आम्ही उद्योगिनी'तर्फे राज्यव्यापी उद्योजिका परिषद संपन्न
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आम्ही उद्योगिनी प्रतिष्ठान मार्फत मुंबई येथे संपूर्ण दिवसभराची राज्यव्यापी उद्योजिका परिषद आयोजित करण्यात आली होती.
या परिषदेच्या उद्घाटन सत्रात महाराष्ट्र स्मॉल स्केल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या सहसंचालिका लीना बनसोड. Nvidia (पुणे)च्या संचालिका जया पानवलकर, सुप्रसिध्द गायिका सहसंचालिका वैशाली सामंत, 'एबीपी माझा'चे संपादक राजीव खांडेकर, माजी आमदार जयूनाना ठाकरे या मान्यवरांचा सहभाग होता. प्रास्ताविकात मीनल मोहाडीकर यांनी संस्थेची माहिती व ओळख करुन दिली. उद्योगक्षेत्रातील महिलांच्या वाढत्या सहभागाचा आढावा घेतानाच लीना बनसोड व जया पानवलकर यांनी आपल्या कारकीर्दीतल्या काही महत्त्वाच्या अनुभवांना उजाळा दिला. 'पिझ्झा बॉक्स'च्या निर्मितीबद्दल माहिती देत आपले छंद आणि करिअर यांचा समतोल सांभाळण्यातील मर्म सांगितले. 'उद्योगिनींनी गृहिणीपणाचं ओझं आणि परफेक्शनचा ताण घेणं टाळलं पाहिजे' असा सल्ला देतानाच 'भान ठेवून योजना आखा आणि बेभान होऊन काम (अंमलबजावणी) करा.'
गेली 20 वर्षापासून आम्ही उद्योगिनी प्रतिष्ठान ही संस्था विनामूल्य उद्योग मार्गदर्शन करत असते तसेच राज्यातील उद्योजक महिलांना पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याला प्रोत्साहन देत असते. या संपूर्ण परिषदेत महिला उद्योजकांची वाटचाल, जडण घडण, शासकीय योजना या संबंधी विविध सत्रात माहिती देण्यात आली. संपूर्ण महाराष्टातून या परिषदेला 900 हून अधिक महिला उद्योजक उपस्थित होत्या.
उद्घाटन सत्रानंतर शासकीय योजना या विषयावर चर्चासत्र संपन्न झाले. यामध्ये एम एस एस आय डी सी च्या डीव्हीजनल मॅनेजर अलका मांजरेकर यांनी नाशिक जिल्ह्यातील गावागावामधील सामान्य गृहिणींना देण्यात आलेले हातमागाचे प्रशिक्षण, त्यांचा उत्साही सहभाग, ठिकठिकाणी भरवण्यात येणारी प्रदर्शने आणि शासनाच्य़ा प्रोत्साहन योजना यांची सविस्तर माहिती दिली.
महाराष्ट्र राज्य व्यवसाय प्रशिक्षण केंद्राच्या ज्योती लोहार यांनी ज्ञानार्जन आणि अर्थार्जन यामधील दरी मिटवण्याच्या दृष्टीने ITIच्या माध्यमातून सातत्याने करण्यात येणारे प्रयत्न आणि त्यांना मिळणारा प्रतिसाद याविषयी उद्बोधक माहिती दिली. ITI च्या ४१७ व्यवसाय प्रशिक्षण केंद्रांचे राज्यभर पसरलेले जाळे, त्यातील विद्यार्थ्यांना लाभणाऱ्या संधी याविषयीदेखील त्या बोलल्या. प्रदीप पेशकार, प्रदेशाध्यक्ष भाजपा उद्योग आघाडी यांनी स्टार्ट अप विषयीच्या अनेक समजुती, गैरसमजुती विशद केल्या. सारस्वत बॅंकेच्या झोनल मॅनेजर शिल्पा मुळगावकर यांनी बॅंकांद्वारे उद्योजक महिलांसाठी राबवण्यात येणाऱ्या शासकीय योजनांची माहिती दिली. यानंतर "मी कशी घडले' ह्या सत्रात यशस्वी उद्योगिनींची प्रेरणादायी कारकीर्द जाणून घेण्याची संधी उपस्थितांना लाभली. यामध्ये इचलकरंजी गारमेंट क्लस्टरच्या किशोरी आवाडे, दुबईमध्ये भारतीय खाद्यपदार्थांचा पुरवठा करणाऱया संजीवनी पाटिल, ’मांगिरीश अॅग्रो-कॉयर इंडस्ट्रीज’च्या अनुराधा देशपांडे, आदिंनी भाग घेतला.
संध्याकाळच्या सत्रात आम्ही उद्योगिनी महिला दिन विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. उद्योगमंत्री सुभाषजी देसाई, रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे अध्यक्ष विनयजी सहस्त्रबुध्दे, अविनाश व ऐश्वर्या नारकर ही सिनेनाट्यक्षेत्रातील जोडी, 'तन्वी हर्बल'च्या संचालिका मेधा मेहेंदळे, 'आर्च ग्रुप', दुबई संचालिका आरती अशोक कोरगावकर, 'हेम कॉर्पोरेशन'चे संचालक उदय शहा, 'नॅशनल स्कूल ऑफ बॅंकींग'च्या अनुराधा ठाकूर, 'वसुंधरा उद्योग'च्या संचालिका मुक्ताताई टीळक यांच्या उपस्थितीत सायंकाळी ए बी पी माझा घे भरारी आम्ही उद्योगिनी गौरव पुरस्काराचे वितरण करण्यात आले.
आपल्या भाषणात उद्योगमंत्र्यांनी शासकीय योजनांच्या सुयोग्य वापर करुन उद्योग क्षेत्रात आपले स्थान निर्माण करावे व महाराष्ट्र शासनाने महिला उद्योजकांसाठी महिला धोरण तयार केले असून ते लवकरच प्रसिध्द होईल अशी घोषणा केली तर विनय सहस्त्रबुध्दे यांनी महिला उद्योजकांची प्रगती म्हणजेच पर्यायाने भारताची प्रगती आहे असे सांगत सर्वांना शुभेच्छा दिल्या.
या संपूर्ण परिषदेचे अतिशय ओघवते व प्रभावी सूत्रसंचालन अनघा मोडक व दुहीता सोमण यांनी केले.
’आम्ही उद्योगिनी’ गौरव पुरस्कारासाठी कौशल्य व शेती क्षेत्रात उद्योग करणाऱ्या महिलांची निवड करण्यात आली.
पुरस्कारप्राप्त उद्योजिका –
* धनश्री गुहउद्योगच्या भारती वैद्य- मुंबई विभाग
* गेली 50 वर्ष हलव्याचे दागिने बनवून 16 कुटुंबांना रोजगार उपलब्ध करुन देणाऱ्या निर्मलाताई अभ्यंकर - पश्चिम महाराष्ट्र विभाग
* आवळा या एका फळापासून अनेक उत्पादने तयार करणाऱ्या सिताबाई मोहीते -मराठवाडा विभाग
* पपया नर्सरीच्या माध्यमातून अनेकांना रोजगार उपलब्ध करुन कार्यरत असणाऱ्या स्मिता इसनगर- उत्तर महाराष्ट्र विभाग
* भागीरथ ग्रमविकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध करुन देणाऱ्या डॉ. हर्षदा प्रसाद देवधर- कोकण विभाग
* रंगरेषाच्या माध्यमातून कार्यरत असणाऱ्या विशाखा राव -जठार -विदर्भ विभाग.
* राष्ट्रीय आम्ही उद्योगिनी पुरस्कार - शुभांगी चिपळूणकर, दिल्ली
* विशेष पुरस्कार - अनुराधा गोरे
* विशेष पत्रकारिता पुरस्कार - शर्मिला कलगुटकर व ऑल इंडीया रेडीओच्या नेहा खरे