साठवण र्निबधातून डाळ आयातदारांना मोकळीक
साठेबाजांवर धडक कारवाईअंतर्गत मुंबई-ठाणे परिसरात टाकण्यात आलेल्या २३ धाडींमध्ये ४३,९७५ टन डाळ जप्त केली गेली आहे. डाळींच्या टंचाईवर मात करून बाजारातील पुरवठा सुरळीत करण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून बडय़ा आयातदारांवरील साठवणीच्या मर्यादा शिथिल करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारच्या विचाराधीन आहे. कडाडलेल्या तूर व मूग डाळीचे भाव पाहता, केंद्राने ऑक्टोबरच्या मध्यावर साठेबाजीला प्रतिबंध म्हणून ही मर्यादा घातली होती. पण गुजरातने बडय़ा आयातदार व्यापाऱ्यांसाठी ही मर्यादा शिथिल केल्यानंतर महाराष्ट्रानेही तेच पाऊल टाकण्याचे ठरविलेले दिसते.
तीन दिवसांपूर्वी डाळींच्या आयातदारांची संघटना असलेल्या मुंबईस्थित ‘आयपीजीए’चे अध्यक्ष प्रवीण डोंगरे यांनी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांची भेट घेऊन आयातदारांवरील डाळींच्या साठवणुकीचे निर्बंध हटविण्याची मागणी केली होती. आयात होणार्या डाळींची राज्यात सध्या सरासरी ३०० ते ३५० टन इतकी आयातदारांकडून मर्यादित काळासाठी साठवण होणे अपरिहार्यच असल्याचे डोंगरे यांचे म्हणणे आहे.
मुंबईतील छाप्यात ४३.५ हजार टन डाळ जप्त
साठेबाजांवर धडक कारवाईअंतर्गत मुंबई-ठाणे परिसरात टाकण्यात आलेल्या २३ धाडींमध्ये ४३,९७५ टन डाळ जप्त केली गेली आहे. उच्च प्रतवारीच्या या डाळीचे मूल्य सुमारे २७१ कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे. शिधावाटप नियंत्रक आणि नागरीपुरवठा विभागाच्या संचालिका श्वेता सिंघल यांच्या नेतृत्वात तयार केलेल्या वेगवेगळ्या २३ संघांकडून या धाड मोहिमा यशस्वी झाल्या आहेत. सरकारच्या अंदाजाप्रमाणे या जप्त झालेल्या डाळी बाजारात आल्यास तूर डाळीचे भाव किलोमागे ५० रुपयांनी खाली येऊ शकतील.