जनधन योजनेतील 28 टक्के खाती निष्क्रिय असल्याचा दावा
पंतप्रधान जन धन योजनेअंतर्गत एका नावाने अनेक खाती उघडली जात आहेत व एकुण खात्यांपैकी सुमारे 28 टक्के खाती निष्क्रिय आहेत, असा दावा मायक्रोसेव्ह या आर्थिक सल्लागार संस्थेने केला आहे.
मायक्रोसेव्हने 17 राज्यांमधील 42 जिल्हे व एका केंद्रशासित प्रदेशाचे सर्वेक्षण केले आहे. सर्वेक्षणाच्या अहवालानुसार, जन धन खाते हे केवळ सरकारी अनुदान किंवा लाभ मिळवण्यासाठी आहे या गैरसमजातून एका व्यक्तीच्या नावाने दोन खाती उघडण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. "जन धन योजनेअंतर्गत आपण पहिल्यांदा खाते उघडलेले नाही असे 33 टक्के ग्राहकांनी सांगितले आहे. पहिल्या व दुसर्या फेरीतदेखील 14 टक्के ग्राहकांचे हेच मत होते. नव्या फेरीत अनेक नागरिकांनी दुसर्यांदा खाती उघडली आहेत. यापैकी कित्येक खाती वापरात नाहीत.", असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. जनधन योजनेअंतर्गत डिसेंबर 2014 मध्ये सर्वात पहिल्या फेरीत अनेक नागरिकांची बँक खाती उघडण्यात आले. त्यानंतर जुलै 2015 मध्ये दुसरी फेरी पार पडली. मायक्रोसेव्हने तिसर्यांदा या योजनेची प्रगती तपासण्यासाठी हे सर्वेक्षण केले. आतापर्यंत 62 टक्के लोकांनी आपले जनधन बँक खाते आधार कार्डाशी जोडल्याचे सांगितले. मागील अहवालात हे प्रमाण 52 टक्के होते. जानेवारी 20 पर्यंत या योजनेअंतर्गत 20.38 बँक खाती उघडण्यात आली आहेत.