निर्यातदृष्टय़ा रसायन उद्योग सर्वाधिक मजबूत – निर्मला सीतारामन
जागतिक व्यापाराच्या दृष्टीने कठीण ठरलेल्या २०१५-१६ सालात भारतातील रसायन निर्यातीने एकूण प्रमाणाच्या तुलनेत ७.५ टक्क्यांची वाढ नोंदविली. एप्रिल २०१६ ते जानेवारी २०१७ या चालू वर्षांत निर्यात किमतीच्या दृष्टीने १.५ टक्क्यांनी तर एकूण प्रमाणाच्या दृष्टीने ७.५९ टक्क्यांनी वाढली आहे. रसायन निर्यातदारांकडून दिसून आलेल्या या कणखर बाण्याबद्दल गौरवोद्गार काढताना, केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री निर्मला सीतारामन यांनी, सरकारने टाकलेल्या उद्योगपूरक पावलांचे दृश्य परिणाम हे येत्या वर्षांपासून पुढे अधिक ठोस स्वरूपात दिसून येतील, अशी ग्वाही दिली.
भारत हा जगातील सहावा मोठा, तर आशियातील तिसरा मोठा रसायनांचे उत्पादन घेणारा देश आहे. भारतातील रसायन उद्योगात २० लाख लोकांना रोजगार पुरविला जात आहे. तब्बल १४७ अब्ज अमेरिकी डॉलर उलाढालीच्या या उद्योग क्षेत्राने २०१५-१६ सालात ११.६८ अब्ज डॉलरची निर्यात केली, तर २०१६-१७ च्या नऊ महिन्यांत निर्यात ९.७६ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. मुंबईत आयोजित केमिक्सिल निर्यात पुरस्कार सोहळ्यातील विजेत्यांचे अभिनंदन करताना, सीतारामन पुढे म्हणाल्या, ‘‘विपरीत जागतिक परिस्थितीतही रसायन उद्योगाने खूपच दांडगी कणखरता दाखविली आहे. रसायन उद्योगाची ही कामगिरी अन्य उद्योगांनाही प्रेरित करणारी आहे. भारतातील एरंडेल तेलाचा जागतिक बाजारपेठेतील ९० टक्के वाटा प्रशंसनीयच आहे आणि काही उत्पादन वर्गात आपल्या पूर्ण वर्चस्वाचे हे उत्तम उदाहरणही आहे.’’