रवांडा-भारत व्यापार तिपटीने विस्तारणार
कृषी, पर्यटन, शिक्षण, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात संधी
मुंबईइतकी लोकसंख्या आणि भारताच्या समकक्ष विकास दर असलेल्या आफ्रिकेतील रवांडा देशाने भारताबरोबरचे व्यापारी संबंध विस्तारण्याच्या दृष्टीने उभय देशांची प्रमुख राजधानी थेट हवाई सेवेने जोडली आहे. भारत आणि रवांडा देशातील सध्याचा २० कोटी डॉलरचा व्यापार येत्या कालावधीत पाच पटीने विस्तारेल, असा विश्वासही यानिमित्ताने व्यक्त करण्यात आला आहे.
आफ्रिकेतील रवांडा देशातील एकमेव सार्वजनिक हवाई प्रवासी वाहतूक सेवा कंपनी असलेल्या रवांडा एअरची रवांडाची राजधानी किगाली ते भारताची आर्थिक राजधानी मुंबई अशी थेट हवाई प्रवासी वाहतूक सेवा आता सुरू झाली आहे. किगाली हे आफ्रिकेच्या मध्यभागी असलेले शहर आहे.
यानिमित्ताने रवांडाचे उच्चायुक्त अर्नस्ट वामुक्यो यांनी पत्रकारांना सांगितले की, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे २०१५ मध्ये आफ्रिकेत येऊन गेल्यानंतर उभय देशातील सामंजस्य अधिक वेग घेत आहे. रवांडा देशही भारताबरोबर व्यापारवृद्धीसाठी उत्सुक असून येत्या काही कालावधीत दोन देशांतील व्यापार सध्याच्या २० कोटी डॉलरवरून तिप्पट होईल.
भारताचे २०२० पर्यंत आफ्रिकेबरोबर १०.७ अब्ज डॉलरचे सहकार्य राहणार असून रवांडा आणि भारतादरम्यान कृषी, पर्यटन, माहिती तंत्रज्ञान, ऊर्जा, पायाभूत सेवा, स्थावर मालमत्ता, शिक्षण, आरोग्य क्षेत्रात कार्य करण्याची संधी असल्याचेही वामुक्यो म्हणाले. रवांडा विकास मंडळाद्वारे रवांडातही भारतीय व्यावसायिकांसाठी सुलभ व्यवसाय वातावरण निर्माण केल्याचे त्यांनी सांगितले.
भारतीयांना रवांडामध्ये कृषी, पर्यटन, निर्मिती उद्योगसारख्या क्षेत्रात संधी असल्याचे स्पष्ट करत वामुक्यो यांनी भारतात आम्ही माहिती तंत्रज्ञान, आरोग्यनिगा, शिक्षण आदी क्षेत्रांतील वाटचालवृद्धी पाहत असल्याचे वामुक्यो यांनी सांगितले. भारतात वैद्यकीय पर्यटन, शिक्षण क्षेत्राकडे रवांडावासीयांचा विशेष कल असल्याचे ते म्हणाले.