‘जागतिक अर्थव्यवस्थेत पुन्हा महामंदीची लक्षणे’- डॉ.रघुराम राजन

Raghuram Rajanजागतिक अर्थव्यवस्थेत १९३० सालच्या महामंदीसारखी लक्षणे हळूहळू सर्वत्र दिसू लागली असून, जगभरातील मध्यवर्ती बँकांनी नवीन नियम व चौकटीसह वाटचाल करण्याची अतीव गरज निर्माण झाली आहे, असे प्रतिपादन रिझव्र्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी लंडन बिझनेस स्कूल येथे आयोजित परिषदेत बोलताना व्यक्त केले.
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे माजी अर्थतज्ज्ञ असलेल्या व २००८ च्या वित्तीय अरिष्टाचे खूप आधी अचूक भाकीत करणाऱ्या राजन यांनी यापूर्वीही एकमेकांशी स्पर्धा करणाऱ्या नरमाईच्या पतविषयक धोरणांपासून जगभरच्या मध्यवर्ती बँकांनी वेळीच फारकत घ्यावी, असे सुचविले. तथापि भारतात मात्र चित्र वेगळे असून, गुंतवणुकीला वाढीचे बळ मिळेल यासाठी रिझव्र्ह बँकेला व्याजाचे दर कमी करावे लागत आहेत, असे राजन यांनी सांगितले.
राजन यांनी सांगितले की, १९३० सारखी महामंदी समोर आ वासून उभी असल्याचे दिसत असताना, किमान आंतरराष्ट्रीय सहमती व एकवाक्यता निर्माण करण्याची गरज निर्माण झाली आहे. ते म्हणाले, सर्वोत्तम उपाययोजनेसाठी खेळाचे नियम कसे असावेत आणि मध्यवर्ती बँकांचा कृती कार्यक्रम काय असावा, याचे संकेत देण्याचा आपला हेतू नाही. तर तो आंतरराष्ट्रीय चर्चेचा विषय बनावा. यातूनच किमान सहमती व आंतरराष्ट्रीय मतैक्य घडवता येईल.
भारताच्या दृष्टीकोनातून व्याजदर कपातीच्या संदर्भात थेट प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले, ‘या संबंधाने बाजारात उमटणाऱ्या प्रतिक्रियांकडे जितका कानाडोळा करता येईल तितका आपला प्रयत्न असतो. गुंतवणूक वाढविली जावी अशा स्थितीत आजही आम्ही आहोत. मी चिंतीत आहे, तो याच बाबीवर. आम्ही व्याजदर कमी केल्याने बँकांची कर्जही स्वस्त होतील का, हा माझ्या चिंतेचा विषय आहे. उद्योगांना स्वस्त कर्जसहाय्य मिळून, ते आपल्या व्यवसायात गुंतवणूक वाढवतील, हे मी पाहतो.’

DEASRA MUV ADVT

Cbmpl Creative Division