संधी खूप आहेत, येणारा काळ सुवर्ण काळ असेल - चकोर गांधी
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँण्ड अग्रिकल्चरच्या नाशिक शाखेच्या ४६ व्या वर्धापन दिनानिमित्त शनिवार दि. २३ मार्च रोजी नाशिक येथे आंतरराष्ट्रीय व्यावसायिक मार्गदर्शक चकोर गांधी यांचे 'सावधान धंदा बदलतो आहे' याविषयावर व्याख्यान संपन्न झाले. याविषयावर मार्गदर्शन करताना म्हणाले की बदल हा निसर्गाचा नियम आहे. ग्राहक बदलला आहे, ग्राहकांची मानसिकता बदलली आहे. पैसे देण्याची पद्धत बदलली आहे. ऑनलाईन खरेदी वाढली आहे, मॉल आले आहे त्यामुळे व्यापारी-उद्योजकांनीही बदल केला पाहिजे. काळानुरूप बदल ही गरज आहे. तुमच्यात ताकद असेल तेवढे करा संधी खूप आहेत. व्यापार-उद्योगात विश्वास महत्वाची बाब आहे. गेल्या १०० वर्षात बदल झाले नाही ते बदल गेल्या ४-५ वर्षात झाले आहेत. देश तरुण आहे तरुणांचा आहे. येणारा काळ सुवर्ण काळ असून २०-२५ वर्षात सोन्याचा धूर निघेल
असे ते म्हणाले. एक माणूस विपरीत परिस्थितीत वेगवेगळ्या उद्योगांची सुरवात कशी करू शकतो याची प्रेरणा शेठ वालचंद हिराचंद यांच्या आत्मचरित्रातून मिळते प्रत्येकाने ते नक्की वाचावे असे ते म्हणाले. याप्रसंगी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष
संतोष मंडलेचा व प्रमुख पाहुणे म्हणून दिवाण हौसिंग फायनान्सचे संचालक श्री. राजेंद्र मेहता, एसकेडी कंन्सल्टंट्सचे अध्यक्ष श्री. संजय
देवरे, प्रमुख मार्गदर्शक श्री. चकोर गांधी, महाराष्ट्र चेंबरचे वरिष्ठ उपाध्यक्ष श्री. अमित कामत आदी मान्यवर उपस्थित होते.