महाराष्ट्र चेंबरतर्फे डिफेन्स क्लस्टरसाठी सर्वतोपरी मदत
- संतोष मंडलेचा
अध्यक्ष, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अॅण्ड अॅग्रीकल्चर
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अॅण्ड अॅग्रीकल्चरच्या अध्यक्षपदी नाशिकचे प्रसिद्ध उद्योजक संतोष मंडलेचा ह्यांची नुकतीच बिनविरोध निवड झाली. त्यानिमित्ताने अविनाश पाठक यांनी त्यांच्याशी केलेली बातचीत. अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्यानंतर केवळ उत्तर महाराष्ट्रातच नव्हे तर प्रथमच कोकणातही सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघातर्फे मंडलेचा यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमांचे औचित्य साधत राज्यभरात जीएसटी करप्रणालीबाबत व्यापारी व उद्योजकांमध्ये जनजागृतीचे, प्रबोधनाचेही काम ते करत आहेत.
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अॅण्ड अॅग्रीकल्चर ही राज्यातील व्यापारी व उद्योजकांच्या विकासासाठी काम करणारी शिखर संस्था आहे. 1927 साली वालचंद हिराचंद ह्यांनी स्थापन केलेल्या या संस्थेला मोठा वारसा आहे. अनेक नामवंत उद्योजक संस्थेचे अध्यक्ष झालेले आहेत. अशा संस्थेच्या अध्यक्षपदी आपली बिनविरोध निवड झाली. कसे वाटते? महाराष्ट्र राज्यातील व्यापार व उद्योग क्षेत्राच्या विकासासाठी भविष्यातील आपली धोरणे काय असतील व त्याची अंमलबजावणी कशी कराल?
महाराष्ट्र चेंबर ही राज्यातील व्यापारी व उद्योजक तसेच शेतकरी, व्यावसायिकांचे प्रतिनिधीत्व करणारी शिखर संस्था आहे. व्यापारी, उद्योजक, शेतकरी व व्यावसायिक संस्थेचे सभासद आहेत. अनेक तज्ज्ञ व दिग्गज व नामवंतांनी महाराष्ट्र चेंबरच्या अध्यक्षपदी काम केले आहे. अशा महाराष्ट्र चेंबरच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली अतिशय आनंद झाला. त्याचबरोबर मोठी जबाबदारी असल्याची जाणीवही झाली. मी 2001 सालापासून महाराष्ट्र चेंबरच्या कामात सक्रीय झालो. त्यानंतर महाराष्ट्र चेंबरच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर दौरे करण्याची संधी मिळाली. राज्यभर दौरे करत असताना सातत्याने व्यापारी व उद्योजकांच्या अडचणी व प्रश्न जाणून घेतले. उपाध्यक्ष, वरिष्ठ उपाध्यक्षपदाच्या कार्यकालात महाराष्ट्रातील व्यापारी व उद्योजकांच्या अडचणी समजून सोडविण्याचा प्रयत्न केला आहे.
स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहनजी भागवत, संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेशजी प्रभु ह्यांच्या उपस्थितीत मुंबई येथे अध्यक्षपद स्विकारले. त्याचक्षणी कामाला सुरूवात झाली. संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे ह्यांनी डिफेन्स क्लस्टरसाठी राज्यात नाशिक, अहमदनगर, औरंगाबद, नागपूर या जिल्ह्यांची निवड केल्याचे जाहीर केले. महाराष्ट्र चेंबरतर्फे डिफेन्स क्लस्टरसाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. डिफेन्स क्लस्टरची संकल्पना समजून घेण्यासाठी व त्यासाठी आवश्यक असलेल्या उद्योगांना एकित्रत आणण्याच्या कामाला चेंबरतर्फे सुरवात केली आहे. संरक्षण मंत्रालयात पत्रव्यवहारही सुरू केला आहे. संरक्षण क्षेत्रातील तज्ञांची समितीही प्राथिमक स्तरावर तयार करण्यात आली आहे. राज्यातील पाचही जिल्ह्यात डिफेन्स क्लस्टरची लवकरात लवकर सुरवात व्हावी यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत.
या व्यतिरिक्त प्रामुख्याने कृषी, पर्यटन व शिक्षण क्षेत्रात भरीव कार्य करायचे आहे. औरंगाबाद व सिंधुदुर्ग येथे कृषी प्रदर्शने, नाशिक, नागपूर व सिंधुदूर्ग येथे टूरिझम कॉन्क्लेव्हचे आयोजन, नाशिक येथे जीएसटीवर भव्य राज्य व्यापारी परिषद, ग्लोबल महाराष्ट्र कॉन्स्फरन्स, मुंबई येथे एमएसएमई कॉन्स्फरन्स असे प्रमुख कार्यक्रम आयोजित करण्याचे निश्चित केले आहे. वर्षभर राबवण्यात येणाऱ्या या कार्यक्रमांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील व्यापारी उद्योजक, शेतकरी व शेतीशी संबंधित उद्योगांना निश्चितच फायदा होणार आहे. या कार्यक्रमांच्या निमित्ताने राज्यातील सर्व सभासद व्यापारी व उद्योजकांना त्या त्या क्षेत्रातील तज्ञांना एकत्र आणण्याचे काम सुरू झाले आहे. माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून केवळ राज्यातच नव्हे तर देशातसुध्दा कार्यक्रमाची माहिती पोहचवण्याचे काम होणार आहे. गेल्या पाच वर्षात महाराष्ट्रभर दौरे केले असल्याने संपर्क वाढला आहे व निश्चितच राज्यातील व्यापारी व उद्योजकांची साथ माझ्या उद्दिष्टपूर्तीत मिळेल असा विश्वास वाटत आहे.
1 जुलै 2017 पासून संपूर्ण देशभरात जीएसटी करप्रणाली लागू झाली आहे. त्याबाबत व्यापारी व उद्योजकांमध्ये वेगवेगळे मतभेद आहेत याबाबत काय सांगाल? जीएसटी करप्रणालीचा व्यापारी व उद्योजकांना फायदा होईल?
जीएसटीबाबत व्यापारी व उद्योजकांमध्ये मतभेद नाहीत संभ्रमाचे वातावरण आहे. मुळात कुठलाही नवीन कायदा किंवा योजना आल्या की त्याची संपूर्ण माहिती कुणालाही नसते त्यासाठी थोडा वेळ जाऊ द्यावा लागतो. लोकांमध्ये जागृती, प्रबोधन, चर्चासत्रांचे आयोजने करावी लागतात. तसेच जीएसटी करप्रणालीचे आहे. जीएसटी करप्रणाली लागू होण्याआधी देशात विविध करप्रणाली होत्या. त्या सर्व एकत्रित करून जीएसटी करप्रणाली लागू करण्यात आली आहे. त्यामुळे नवीन करप्रणाली समजून घेतल्यानंतर जीएसटी कर चांगला असल्याचे निश्चितच जाणवते. देशाला, व्यापारी उद्योगांना आर्थिक प्रगतीकडे नेणारी जीएसटी करप्रणाली आहे. त्यासाठी महाराष्ट्र चेंबरच्या माध्यमातून व्यापारी व उद्योजकांसाठी जीएसटीवर कार्यशाळा, चर्चासत्र, संपूर्ण महाराष्ट्रभर आयोजित करण्यात येत आहेत. नाशिक, कळवण, सटाणा, नागपूर, सिंधुदुर्ग येथे कायर्शाळा संपन्न झाल्या असून तेथील व्यापारी व उद्योजकांना तज्ञांचे मार्गदर्शन मिळाल्याने त्यांचा जीएसटीकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलत आहे.
अध्यक्षांचा थोडक्यात परिचय.
संतोष मंडलेचा हे व्यापारी कुंटुंबातील व्यक्तिमत्व. नाशिकरोड येथून शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर चांदवड होथील जैन महाविद्यालयातून इंजिनिअरींगचा डिप्लोमा पूर्ण केला. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर काही दिवस नोकरी केली. मात्र व्यापारी कुंटुंबातील असल्याने त्यांच्यातील व्यापारी वृत्तीने त्यांना नोकरीत जास्त वेळ टिकू दिले नाही. त्यामुळे त्यांनी उद्योग करण्याचे ठरविले. त्यानुसार 350 चौरस फुटाच्या भाड्याच्या जागेत रिलायन्स इंडस्ट्री सुरू केली. दिवसरात्र मेहनत करून उद्योग वाढिवला. उद्योगाचा विस्तार केवळ नाशिक, महाराष्ट्रापुरताच मर्यादित न ठेवता राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांनी आपल्या उद्योगाचा ठसा उमटविला. रिलायन्स इलेक्ट्रोनिक्स हा स्वत:चा ब्रॅण्ड निर्माण केला. आजमतीला त्याच्या उद्योगाचा विस्तार मोठ्या प्रमाणात झाला असून सव्वालाख चौरस मिटर फुटाची जागा तोकडी पडत आहे. आजपावेतो राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहेत.पॉवरथर्म कॅपेसिटर प्रा. लि., परमात्मने डिझाईन स्टुडिओ, रिलायन्स इक्विपमेंट प्रा. लिमिटेड या त्यांच्या कंपन्या आहेत.
स्वत:चा उद्योग वाढवत असताना औद्योगिक व सामाजिक क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे. निमा, आयमा या संघटनांच्या कार्यकारीणीत पदाधिकारी म्हणून काम केले आहे. तसेच आयमा व निमा इंडेक्स प्रदर्शनाच्या यशस्वी आयोजनासाठी त्यांनी भरीव कार्य केले आहे.
- अविनाश पाठक
9225724440