संपादकीय
जगात सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून भारतीय अर्थव्यवस्थेकडे पहिले जाते. ह्यात आपल्या देशाने चीनला सुद्धा मागे टाकले आहे अशी आकडेवारी सांगते. अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या, भांडवल पुरवणार्या कंपन्या, ह्यांचे लक्ष आज भारताकडे लागले आहे.
भारताकडे लक्ष असण्याची दोन करणे आहेत. पहिले म्हणजे पायाभूत सुविधा वाढवण्यासाठी जे प्रकल्प सुरु आहेत वा येऊ घातले आहेत त्या मध्ये सहभागी होणे. ह्याशिवाय अनेक कंपन्या आपल्या उत्पादनांसाठी एक मोठी बाजारपेठ म्हणून भारताकडे बघत आहेत. आपल्यासाठी ह्या दोन्ही गोष्टी स्वागतार्ह आहेत कारण ह्या माध्यमातून आपल्या देशातील रोजगार वाढणार आहे तसेच अर्थव्यवस्थेला सुद्धा गती येणार आहे.
२०१६ साली मुंबईत Make In India हा एक मोठा औद्योगिक सोहोळा पार पडला. ह्यात हजारो कोटींच्या MoUs वर स्वाक्षऱ्या झाल्या पण त्यातील थोडेच MoU प्रत्यक्षात उतरले किंवा त्या प्रक्रियेत आले. हल्लीच काही दिवसांपूर्वी 'मॅग्नेटिक महाराष्ट्र' हे औद्योगिक प्रदर्शन पार पडले. ह्यात सुद्धा सुमारे १२ लाख कोटींचे MoUs झाले. ह्या निमिताने आज सुद्धा महाराष्ट्र हेच भारतातील सर्वात गुंतवणूक स्नेही राज्य आहे हे अधोरेखित झाले. आता ह्या MoUs पैकी जास्तीत जास्त प्रत्यक्षात कसे उतरतील ह्याची काळजी संबंधित खात्यांनी करायला पाहिजे. ह्या निमिताने अनेक बहूराष्ट्रीय कंपन्यांनी भारतावर व महाराष्ट्रावर विश्वास दाखवला ही सुध्हा एक स्वागतार्ह बाब म्हटली पाहिजे.
नुकत्याच जाहीर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पाविषयी सध्या अनेक स्तरांवर चर्चा सुरु आहे. मध्यम वर्गाला ह्यात काहीच मिळाले नाही असा एक सूर ह्या चर्चेत ऐकू येतो. जागतिकीकरणानंतरच्या पंचवीस वर्षात सर्वात जास्त फायदा जर कुठल्या वर्गाला झाला असला तर तो मध्यम वर्गाला. त्या मानाने शेतकरी वर्गाची स्थिती आज सुद्धा 'जैसे थे' अशीच म्हणावी लागेल. भारतातील श्रीमंत व गरीब ह्यांच्यातील दरी दिवसेंदिवस वाढत आहे असे सर्व अहवाल सांगतात. ह्या पार्श्वभूमीवर त्या वर्गाला बळ देणे फक्त त्यांच्याच नव्हे तर देशाच्या सुद्धा भल्याचेच आहे. अर्थकारणाचे गाडे केवळ एका वर्गावर चालू शकत नाही. अर्थसंकल्पात शेती व्यवसायावर व निम्न स्तरावर दिलेला भर हा योग्य असाच म्हणावा लागेल.
धोरण आखणे जेवढे महत्वाचे तेवढेच ते तडीस नेणे. आज अनेक सरकारी योजना,धोरणे फक्त कागदावरच राहतात, सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचतच नाहीत. ह्यात digitization हे खूप मोठी भूमिका पार पाडू शकते व आपण त्याच दिशेने पाऊले टाकत आहोत ही समाधानाची बाब आहे !